जागतिक मराठी लेखन उत्सव अर्थात जामलेखन उत्सव हा मराठीतून लेखनाभिव्यक्ति करू इच्छिणार्या जगातल्या प्रत्येकाचा उत्सव आहे. ताई, माई, अक्का, दादा, अण्णा, आप्पा, विन्या, पम्या, विनी, सोनाली अशा घरातल्या मोठ्यातल्या मोठ्या आणि लहानातल्या लहान लिहिणार्या व्यक्तीसाठी हा उत्सव आहे. आपल्या मनातली गोष्ट सांगून पाहावी एकदा असं वाटणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा उत्सव आहे.
कागदावर पेन गिरवा किंवा की-बोर्डवर बोटं आपटा....तुमच्यात असणा-या सृजनतेला मोकळं करा. डोक्यातल्या विचारांना शब्दांच्या माध्यमातून बाहेर काढा. खच्चून लिहा, अक्षरांच्या राशी रचा, विचारांनी पानंच्या पानं भरा, भावनांना शाईची वाट करून द्या, अलंकारांशी खेळा, स्वरव्यंजनांच्या माळा गुंफा, जामलेखन करा.
पन्नास हजार शब्दांची कादंबरी, चित्रपट पटकथा, नाटक, आत्मकथन, जीवनचरित्र नव्वद दिवसात लिहा. 1 जानेवारी ते 30 मार्च, 2012 (31 मार्च तारीख ठेवली तर एक्याणण्णव दिवस होतात ना???? म्हणून), या नव्वद दिवसांत पन्नास हजार शब्दांचे वर उल्लेखिलेले काहीही लिहा आणि व्हा यावर्षीचे जामलेखक.
थोडासा भागाकार वगैरे केलात तर दररोज लिहायचे आहेत केवळ 555 शब्द. बस्स्स! अगदी सोप्पं आणि सहज शक्य आहे. मग वाट कसली पाहताय? येऊ द्या बाहेर मनातील ती पात्रे, त्या घटना, ते संघर्ष, ते वादविवाद, ती स्वप्नं, ती मजा, ती मौज, ती सुखदु:खं, ते सगळे आठ रस (की नऊ, की बारा...की.....) आणि चार भाव. अवतरू दे शब्दांत तुमच्या मनातले जग. करा धमाल, खेळा शब्दांशी, अलंकारांशी, स्वरांशी, व्यंजनांशी. करू देत त्यांना धमाल तुमच्या मेंदूत आणि बाहेर पडू देत एक मस्त कलाकृती. एकदा पहा बनून विश्वकर्मा.
अलिबाबाची ही गुहा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 1 जानेवारी रोजी 00.00 वाजता उघडेल आणि 30 मार्चला 23.59 नंतर त्वरित बंद होईल. मग 1 तारखेला तयार व्हा ‘खुल जा सिमसिम’ म्हणायला आणि उतरा या अभूतपूर्व लेखनोत्सवात.